कोल्हापूर – काँग्रेसचे सरकार आले तर महाराष्ट्रात पुन्हा काय होईल, याचा अनुभव जनतेने घेतला आहेच, परंतु तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर ‘इटस ओके..!’ जे व्हायचे ते होईल त्याला आम्ही घाबरत नसल्याचा इशारा भाजपचे नेते आणमि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजप अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान आमची अगतिकता महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी ही युती होणे आवश्यक आहे त्यामुळे शिवसेनेसोबत युती व्हावी ही इच्छा असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या वादावरही त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मैत्रीत राजकारण आणलं असून ‘शिवसेनेने केलेले राजकारण मनाला लागणारे आहे. दुसऱ्याच्या घरातील खुर्ची उचलून नेता आणि ती माझीच असल्याचा हक्क सांगण्यातला हा प्रकार आहे. शिवसेनेच्या कृत्याचा पक्षावर आघात झाल्यामुळेच मुख्यमंत्रीही द्वेषाने या निवडणुकीत उतरले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post