'डहाणू-नाशिक रेल्वेची गरज असताना बुलेट ट्रेन कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत, फाफडा खायला तुम्हाला गुजरातला जायचे आहे का, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर परखड टीका केली. पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी गुरुवारी जव्हार येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

चिंतामण वनगा यांनी डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र या भाजप सरकारने कोणाच्याही कामाला न येणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करून गरीब आदिवासी जनतेची जमीन उकळण्याचे काम हे करीत आहेत. हे आपल्याला हाणून पडायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 'आपण धनुष्यबाणाला मतदान करणार, मात्र मतदान केल्यावर धनुष्यबाणाची लाइट जळते की नाही, ते पाहिले बघा आणि आता स्लिपसुद्धा निघणार आहे तीही पहा,' असा टोला ईव्हीएममशीनबाबत त्यांनी लगावला.

'निवडणूक आहे म्हणून काहीतरी खोट बोलायचे आणि नंतर गायबच व्हायचे, अशी कामे मी करत नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, कारण आज काहीही बोललो तरी पुन्हा आठ-नऊ महिन्यांनी तुमच्याकडे मते मागायला यावेच लागणार आहे', असेही ते म्हणाले.

'पालघर लोकसभा हा भाजपकडेच असल्याने आम्ही आजवर लक्ष नाही दिले कारण दिवंगत चिंतामण वनगा या भागातले होते, मात्र ते गेल्यानंतर श्रीनिवासला उमेदवारी द्यायला भाजप तयार नसल्यानेच आम्ही त्याला उमेदवारी दिली. जर भाजपने त्याला उमेदवारी दिली असती तर त्याचा प्रचार करायला आलो असतो, असेही ठाकरे यांनी मोखाडा येथे काढले. या भागातील पाणीप्रश्नासाठी सातत्याने शिवसेना प्रयत्नशील असून लोकांच्या पाण्यासाठी चार कोटी रुपये आम्ही जिल्हा परिषदेला दिले आहेत. यामुळे आम्ही या भागातील हंडे कळशा भरूनच देणार आहोत, दुसऱ्यासारखे रिकामे पाठवणार नाही, असेही ते म्हणाले.

ज्यांच्याकडची थैली, त्यांना लगेच पक्षप्रवेश देणारा आमचा पक्ष नाही तर तुम्ही समोर बसलेले सर्व आमची थैली आहात,' असे प्रतिपादन ठाकरे यांनी मोखाड्यात केले. ते म्हणाले की ज्या माणसाने पक्षासाठी मरमर काम केले, पक्ष वाढविला त्या वनगा कुटुंबीयांना भाजप विसरली असून 'गरज सरो, वैद्य मरो अशी भाजपतऱ्हा आहे. ज्या वनगांनी आयुष्यभर निष्ठेने कम केले, पालघरमधे मोठ्या प्रमाणात भाजप वाढवली, त्या वनगांच्या कुटुंबाला भाजपने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे त्यांच्या अश्रूंना न्याय देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे, आम्ही कुणाच्याही पाठीत वार केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यांनी गुरुवारी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आणि डहाणू तालुक्यांमध्ये थेट मतदारांशी संपर्क साधला. तर, जव्हारमध्ये सभा घेतली. या प्रचारदौऱ्यात आमदार एकनाथ शिंदे, शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार राजन विचारे, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, माजी आमदार दौलत दरोडा यांसह पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post