मध्यरात्रीची वेळ… किर्र अंधार दाटलेला… श्वासांचाही आवाज नको म्हणून तोंडावर हात दाबून ठेवलेला.. दोन महिला आणि दोन लहान मुलांना कडे करून त्या बहाद्दर शिवसैनिकांनी बाहेर काढले. जीवावर उदार होऊन ते सर्वजण नवाबपुऱ्यातून राजाबाजारकडे निघाले.. ठेचकाळत… अदमास घेत… अचानक मधमाशांचे मोहोळ उठावे तशी गल्लीबोळातून ‘मारोs, काटो’sss म्हणत धर्मांधांची झुंड तुटून पडली.. चोहोबाजूने टोळधाडीने घेरले.. एकाने डोक्यात काठी घातली.. दुसऱ्याने तलवारीचा वार केला.. गाठ प्राणाशी होती.. पण न डगमगता तळहातावर शिर घेऊन या चौघांनी हिंदु कुटुंबाला दंगलखोरांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले…
शुक्रवारी मध्यरात्री धर्मांधांनी शहर पेटवले. बघता बघता राजाबाजार, शहागंजात दंगलीचा भडका उडाला. मोतीकारंजा, गांधीनगर अगोदरच धुमसत होते. नवाबपुऱ्याच्या एका टोकाला राहणाऱ्या हिंदु कुटुंबाच्या जिवाचा थरकाप उडाला. घरात दोन म्हातारी माणसे, दोन तरुण मुले, त्यांचे कुटुंब, लहान मुले.. पुरुष मंडळीनी घरातच थांबण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडायचे कसे, कारण रस्त्यावर दंगलखोरीला ऊत आला होता. परिचयातल्या गुलशन वाधवानी यांना त्यांनी फोन केला आणि सुरक्षित बाहेर काढण्याची विनंती केली. वाधवानी यांनी नगरसेवक सचिन खैरे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तोपर्यंत राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज हा भाग दंगलखोरांच्या ताब्यात गेला होता.
पोलिसांच्या मदतीने घर गाठले
नगरसेवक सचिन खैरे, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, गुलशन वाधवानी हे रात्री दीड वाजता पोलिसांची मदत घेऊन कसेबसे त्या घरापर्यंत पोहोचले. तेथून दोन महिला, दोन लहान मुलांना घेऊन हे शिवसैनिक राजाबाजारकडे निघाले. दंगलखोरांनी वीज घालवलेली होती. त्यामुळे रस्ता दिसत नव्हता. अंदाज घेत हे सर्वजण निघाले. गुलशन हार्डवेअरच्या थोडे पुढे येताच गल्लीबोळातून नंग्या तलवारी नाचवत धर्मांधांची झुंड आली. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या, पेट्रोलबॉम्ब होते. त्या कुटुंबाला धीर देत हा काफिला पुढे निघाला. बघता बघता गल्लीबोळातून दंगलखोरांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडल्या. या चक्रव्यूहात हे सारेजण फसले.
एकेक पाऊल मणामणाचे…
चोहोबाजूने प्रत्यक्ष मृत्यूच उभा होता. गाठ प्राणाशी होती. क्षणार्धात दंगलखोरांना कराल पंजात सर्वजण सापडले. मारो, काटोची भाषा सुरू झाली. काही जणांनी तलवारी उपसल्या… राजेंद्र जंजाळ यांनी ‘हमारे साथ लेडीज है.. जाने दो’ अशी विनंती केली. पण धर्मांधांच्या डोळ्यात खून उतरला होता. त्यातल्याच एकाने जंजाळ यांच्या डोक्यात बांधकामासाठी वापरण्यात येणारी बल्ली घातली. डोक्यावरचा घाव चुकला आणि तो हातावर बसला. दुसऱ्याने तलवार उपसली. पण त्याचाही वार चुकला. तिसऱ्याने काठी हाणली, ती सचिन खैरे यांच्या हातावर लागली. एकेक पाऊल मणामणाचे वाटू लागले. आता पळालो नाही तर जीव वाचणार नाही हे लक्षात येताच या सर्वांनी धावायला सुरुवात केली. पायात हत्तीचे बळ आले. पण तेवढ्यात ठेचकाळून छोटी मुलगी पडली.. अंधारात न दिसल्याने वृद्धाही कोसळली. पाठोपाठ दंगेखोरांची टोळी तेथे येऊन धडकली. दुसऱ्या महिलेने सचिन खैरे यांचा हात घट्ट धरला. कसेबसे त्यांना उठवत या सर्वांनी पुन्हा तेथून पळायला सुरुवात केली.. ते राजाबाजार येईपर्यंत. नवाबपुरा ते राजाबाजार हे अंतर अवघे सात मिनिटांचे. दंगलखोर हजार अन् शिवसैनिक चार! पण शिवरायांचा विचार अन् शिवसेनाप्रमुखांच्या संस्काराचे कवच करून या बहाद्दरांनी एका हिंदु कुटुंबाचे रक्षण केले..
तो क्षणही आठवावा असं वाटत नाही
तीन दिवस झाले. पण डोक्यातून तो क्षण जात नाही अन् आठवावाही वाटत नाही. अंधाराकडे पाहतानाही काळजाचे पाणी पाणी होते. हे चौघे भाऊ नसते तर.. हा विचार येताच थरकाप उडतो… त्या ताई सांगत होत्या. साठ वर्षांपासून या भागात राहतो. पण असा प्रसंग कधी गुदरला नाही. शुक्रवारची रात्र मात्र काही वेगळेच घेऊन आली होती. काळच आमच्यासमोर उभा होता, पण नशीब बलवत्तर म्हणून आजचा दिवस बघायला मिळाला. पण आता या ठिकाणी श्वास गुदमरतो.. त्यामुळे लवकरच घर बदलणार, असेही त्या ताई म्हणाल्या.
माझ्यापुढे फक्त त्या दोन महिला ती दोन मुले आणि त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल असणारा विश्वास दिसत होता. त्याच विश्वासाच्या जोरावर आम्ही नवाबपुऱ्यातून निघालो. माताभगिनीच्या केसालाही धक्का लागता कामा नये हा शिवसेनाप्रमुखांचा संस्कार आहे. याच विचाराने आम्हाला पुढे राजाबाजारपर्यंत आणले. – राजेंद्र जंजाळ
नवाबपुऱ्यातून निघताना काय होईल असा विचारही मनाला शिवला नाही. दंगलखोरांनी घेरल्यावर मात्र आपण संपलो असे वाटले. पण आपण धीर सोडला तर या कुटुंबाचे तुकडेच होतील हे लक्षात आले आणि धाडस करून पुढे निघालो. संस्थान गणपती दिसताच जिवात जीव आला...- सचिन खैरे
दंगलखोरांनी मारो काटोचा पुकारा करताच काळजाचा थरकाप उडाला. पण सोबत दोन महिला, छोटी मुले होती. आम्हीच घाबरलो असतो तर त्यांचाही धीर खचला असता. त्यामुळे एकमेकांना धीर देत आम्ही सारेजण पुढे निघालो. नशीब बलवत्तर म्हणूनच वाचलो, नाहीतर खांडोळीच झाली असती. – ऋषिकेश जैस्वाल

Post a Comment

Previous Post Next Post