मुंबई: भारताच्या 2011 सालच्या विश्वचषकाच्या विजयाचा हिरो झहीर खान ठरला होता.

महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये 7 ऑक्टोबर 1978 रोजी जन्मलेल्या झहीर खानने, भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं. त्याच्या अनेक अविस्मरणीय खेळी भारतीयांच्या मनात आजही कायम आहे.

भेदक गोलंदाजीमुळे तमाम भारतीयांनी झहीरचं नेहमीचं कौतुक केलं. पण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाची चर्चा आजही होतेच होते.

झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. झहीर खान 2004 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाकिस्तानातील आघाडीचं दैनिक ‘डॉन’ने त्याची मुलाखत छापली होती.

यावेळी झहीरला बाळासाहेबांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.  “तू भारतात – महाराष्ट्रात राहतोस. तिथे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे, याचा तुला एक मुस्लिम म्हणून काही त्रास होतो”? त्यावर झहीरने दिलेल्या उत्तरामुळे शिवसेनाप्रमुखांसह तमाम शिवसैनिकांचा उर अभिमानाने भरून आला होता.

झहीर म्हणाला होता, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिमविरोधी नाहीत. काही जणांनी स्वत:च्या फायद्यासाठी बाळासाहेबांची इमेज ‘मुस्लिमविरोधी’ अशी बनवली आहे. मात्र भारतातील देशभक्त मुस्लिमांना ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही त्रास नाही. जे विध्वंसक कृतीमध्ये सहभागी असतात, त्यांनाच शिवसेनेचा विरोध आहे”.

झहीर खानच्या या उत्तरामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह शिवसैनिक फिदा झाले होते. झहीरने आपल्याला धर्मनिरपेक्ष म्हटल्यामुळे त्याला बाळासाहेबांनी धन्यवाद दिले होते. इतकंच नाही तर बाळासाहेबांनी झहीर खानला ‘खरा हिंदुस्तानी मुसलमान’ असं संबोधलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post