मुंबई :- भाजप अध्यक्ष अमित शहा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं असलं तरी शिवसेनेनं मात्र स्वबळावरच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'आम्ही स्वबळावरच लढू, या निर्णयात कोणताही बदल होणार नाही,' असं स्पष्ट करतानाच शिवसेनेच्या ताकदीनं अनेकांना धडकी भरली आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला हाणला आहे. त्यामुळे शहा-ठाकरे यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

आज होणाऱ्या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. 'पालघर पोटनिवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवली. जिथे निवडणूक कधी लढवली नव्हती, तिथे लाख लाख मतं मिळाली. आमची मतं पाहून अनेकांना धडकी भरली आहे. चार वर्षानंतर अमित शहा यांना 'मातोश्री'वर का यावंस वाटतं याचा विचार करा,' असा टोला राऊत यांनी लगावला.

'एनडीएमधील मित्रपक्ष एकापाठोपाठ सोडून जात आहेत. देशातील राजकारणही बदलत आहे. भाजपविरोधातील रोष वाढत आहे. त्यामुळे सगळ्यांना भेटून मोट बांधावी, असं भाजपला वाटत असेल, त्यामुळे हे भेट होत असावी,' असा चिमटाही त्यांनी काढला. 'उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. जनमानसाचा कानोसा घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला असून त्यात बदल होणार नाही,' असं सांगतानाच 'पालघरमध्येही आम्ही स्वबळावर लढवून आमची ताकद दाखवून दिलीच ना?,' असंही राऊत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post