शिवसेना माजी तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी आयडीबीआय बँकेतील अधिकाऱ्यांना घेराव घालून येत्या ३० ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन बँक अधिकाऱ्यांकडून घेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

माहे जून पासून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास आडीबीआय बँकेने पीककर्ज दिले नाही. यामुळे ढेबेवाडी येथील शेतकऱ्यांनी माजी तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या कार्यालयात येऊन गाऱ्हाणे मांडले. मुरकुटे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन बँके जाऊन शाखा व्यवस्थापक संजय मुसडे यांना घेराव घालत जाब विचारला. लेखी आश्वासन दिल्यावरच घेरावास मोकळीक केला.

तालुक्यातील ढेबेवाडी येथील शेतकऱ्यांना आडीबीआय ही दत्तक बँकेत माहे मे महिन्यामध्ये नियमाप्रमाणे पीककर्ज मागणीपत्र दिले होते. परंतु बँकेच्या गलथान कारभारामुळे बँकेने जाणिवपूर्वक शेतकऱ्यांशी चेष्ठा करत ५ महिने उलटले. असे असताना शेतकऱ्यांना पीककर्ज दिले नाही. अनेकवेळा बँकेचे खेटे मारले, थातूर-मातूर उत्तरे देत देतो-देतो म्हणत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याने कंटाळून ढेबेवाडी येथील शेतकऱ्यांनी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख मुरकुटे यांच्या कार्यालयात येऊन गाऱ्हाणे मांडले. यावेळी विष्णू मुरकुटे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकाला घेराव घातला. जाब विचारत प्रलंबित कर्ज वाटप निकाली काढा अन्यथा आज बँकेला टाळे ठोकण्याचा सज्जड दम दिला. यावेळी शाखा व्यवस्थापकांनी संबंधीत कर्ज विभागाशी चर्चा करुन प्रलंबित कर्ज प्रकरण ३० ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज रक्कम जमा करण्यात येईल, तर चालू उर्वरीत कर्ज प्रकरणे ३० नोव्हेंबरपर्यंत कर्ज देण्यात येईल, असे लेखी आश्वासन विष्णू मुरकुटे यांच्यासह शेतकऱ्यांना दिले.

याचवेळी घेराव मोकळा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब राखे, ढेबेवाडीचे शेतकरी सरपंच नाथराव फड, उपसरपंच राम आंधळे, माजी सरपंच सदानंद फड, श्रीहरी फड, भाऊराव मुंडे, सिद्धेश्वर आंधळे, सचिन फड, प्रल्हाद फड, ज्ञानोबा फड, गोविंद फड, मधुकर मुंडे, माधवराव आंधळे यांच्यासह २५ शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी माजी तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांचे आभार व्यक्त करत समाधान मानले.

Post a Comment

Previous Post Next Post